ST MAHAMANDAL NEWS: राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक नागरिक प्रवास करत आहेत. शहरातून गावाकडे किंवा गावातून शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा आणि प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
एसटी प्रवाशांसाठी आरामदायक आणि आरोग्यदायी जेवणाची सोय
लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासादरम्यान बसेस जे ठराविक हॉटेल-मोटेल थांब्यांवर थांबतात, तेथील जेवण बऱ्याचदा महाग, चवहीन आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असते. तसेच महिला प्रवाशांसाठी अशा ठिकाणी असुविधा जाणवतात. त्यामुळे अशा ठिकाणांची आता सखोल झाडाझडती होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा हॉटेल-मोटेल थांब्यावर जर प्रवाशांना स्वच्छ, आरोग्यदायी व किफायतशीर सुविधा मिळत नसतील, तर त्या थांब्यांवर कारवाई होणार. योग्य सुविधा नसलेल्या थांब्यांना रद्द करण्यात येईल आणि नवीन चांगल्या सोयी असलेल्या थांब्यांना मान्यता दिली जाईल.
15 दिवसांत सविस्तर सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश
राज्यातील सर्व थांब्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तपासून, त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई
मंत्री सरनाईक यांनी हेही स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड न करता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलण्यात यावीत.